पुढील १५ वर्षात अखंड भारत पहायला मिळेल; मोहन भागवत यांचा दावा 

हरिद्वार- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. भागवत यांनी  पुढील १५ वर्षात अखंड भारत (Akhand Bharat) होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. हरिद्वारमध्ये बोलताना  ते म्हणाले की, संतांच्या ज्योतिषशास्त्रानुसार 20 ते 25 वर्षांत भारत पुन्हा अखंड भारत होईल. आपण सर्वांनी मिळून या कामाचा वेग वाढवला तर 10 ते 15 वर्षात अखंड भारताची निर्मिती होईल.

मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारताची कल्पना मांडताना म्हटलं की, “हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. पुढील १५ वर्षात पुन्हा एकदा अखंड भारत पहायला मिळेल. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो, मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल. आमच्या मनात द्वेष नाही, पण जग शक्तीला मानतं मग काय करणार?”.असं देखील ते म्हणाले.

भागवत म्हणाले की, जे तथाकथित लोक सनातन धर्माला विरोध करतात, त्यांचेही त्यात सहकार्य आहे. त्यांनी विरोध केला नसता तर हिंदू जागा झाला नसता. यावेळी महामंडलेश्वर स्वामी गिरीधर, स्वामी विषोकानंद भारती, स्वामी विवेकानंद, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा महानिर्वाणी आखाडा रवींद्रपुरीचे सचिव, महामंडलेश्वर हरिचेतानंद आदी उपस्थित होते.