ठाण्यातील रस्त्यांची गुणवत्ता आयआयटी मुंबईकडून तपासली जाणार; मुख्यमंत्र्यांचे ठाणे महानगरपालिकेला निर्देश

ठाणे :- दरवर्षी पावसाळा आला की रस्त्यांची गुणवत्ता हा विषय कायम चर्चेत येतो. मुंबई आणि ठाणे शहरात रस्ते तयार होतानाच त्यांची गुणवत्ता तपासली जायला हवी अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायमच घडते. नेमकी हीच बाब ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाणे शहरातील रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पहिल्यांदाच कोअर कटर मशीनचा वापर करून या रस्त्यांचे नमुने घेऊन आयआयटी मुंबई प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सध्या दररोज मुंबई शहरातील नालेसफाई आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत. यातच आज त्यांनी आपला मोर्चा ठाणे शहराकडे वळवत रस्तेकामाची आणि नालेसफाईची पाहणी केली. यावेळी शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे आहेत अथवा नाहीत हे तपासण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन या रस्त्यांचे त्रयस्थ मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आज रस्ते पाहणी दौर्यादरम्यान कोअर कटर मशीनचा वापर करून रस्त्यांचे नमुने घेण्यात आले.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि माजी महापौर नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा महिला संघटीका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, तसेच महानगरपालिकेचे सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसे होणार रस्त्यांचे त्रयस्थ मूल्यमापन..?

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज या कोअर कटर मशीनचा वापर करून रस्त्यांचा तुकडा काढून घेतला गेला. हा तुकडा आयआयटी मुंबई मध्ये तपासला जणार आहे. कोणत्याही रस्त्यांचे काम करताना विशिष्ट मातीचा थर त्यावर खडी आणि नंतर त्यावर डांबराचे थर चढवले जातात, त्यांत योग्य गोष्टींचा वापर केल्यास जेवढा जाड थर जमतो तेवढा जमला आहे का हे मोजपट्टीच्या सहाय्याने लगेच कळते मात्र तो बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तू दर्जेदार आहेत अथवा नाही याची तपासणी करण्यासाठी तो प्रयोगशाळेत न्यावा लागतो. तिथे तपासणी केल्यानंतरच रस्त्यांचा दर्जा चांगला आहे अथवा वाईट याबाबत अंतिम अहवाल महानगरपालिकेला प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रस्त्यांचे असे मूल्यमापन होणार असून त्यातून रस्त्यांचा खरा दर्जा लोकांना कळू शकणार आहे.आज घेतलेले नमुने हे डांबर आणि काँक्रीट आशा दोन्ही रस्त्यांचे घेण्यात आले असून ते आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अशाप्रकारे करण्यात आलेला हा पहिलाच प्रयोग असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यासाठी पुढाकार घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.