‘हिम्मत असेल आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तर या सरकारने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करावा’

पुणे : सध्या संपूर्ण जग पुन्हा एकदा करोनाच्या संकटाचा सामना करत असून नव्या आव्हानांचा सामना करत आहे. देशात करोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून याआधी आलेल्या दोन लाटांमध्ये फार मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. मात्र कोरोना या महाभीषण रोगाला काही लोकांनी चेष्टेचा विषय बनवला आहे. त्या सर्वात वरच्या क्रमांकावर कोणी असेल तर सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज.

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी याआधी आपण कोरोनाची लस घेणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. मात्र अशातच महाराजांनी पुन्हा एकदा कोरोना संदर्भात आणखी एक वक्तव्य केलं आहे. ‘मला कोरोना झाला नाही कारण मी माळकरी आहे. कोरोनाची तिसरी लाट आपल्यासाठी नाहीच मात्र ज्यांनी माळा काढल्या त्यांना कोरोना गाठणारच असं विधान इंदोरीकर महाराज यांनी केले आहे. त्यांनी लातूर मध्ये एका कीर्तनात हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

‘दीड वर्ष काय लक्षात कुठे राहिलंय? ८० टक्के भजनं, हरिपाठ विसरले. ४० टक्के किर्तनकारच हरिपाठ विसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करुन काय करायचं? ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. अंडे खाल्यावर करोना होत नाही कोणीतरी सांगितलं आणि वांगी सोडून अंडी खायला लागले. टीव्हीला माळकऱ्यांना पाच हजार मिळणार असल्याची बातमी आली आणि पुन्हा माळ घातली. पण तिसरी लाट ही फक्त माळा काढणाऱ्यांसाठीच असणार, असं इंदुरीकर महाराज म्हणाले. यावेळी त्यांनी मन खंबीर ठेवणं हेच करोनावरील औषध असल्याचं म्हटलं.

इंदुरीकर महाराज यांच्या या वक्तव्याच्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘मी माळकरी आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारचं असे सांगून किर्तनाच्या माध्यमातून इंदुरीकर अंधश्रद्धा पसरवत आहेत. कोरोना ही महाभयंकर महामारी असून सध्या तिसरी लाट आपल्या देशात आहे. याआधी अनेक जणांना कोरोनामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले आहे तर अनेक जण मृत्यूच्या दारातून बाहेर आले आहेत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.त्यातच सरकार सुद्धा जनजागृती करत आहेच, परंतु स्वतःला कीर्तनकार म्हणविणारे इंदुरीकर पुन्हा एकदा असे वक्तव्य करून अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.

सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेते यांनी ठेवलेल्या प्रवचनाला इंदुरीकर यांना बोलविले जाते आणि गर्दी जमा होते, आता लवकरच निवडणुका आहेत केवळ म्हणूनच दरवेळी त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांकडून केला जातो. असा टोला तृप्ती देसाई यांनी लगावला आहे.

याआधी सुद्धा त्यांच्या कोरोनावरील वक्तव्यावर सरकारने कोणतीही कारवाई न करता सूट दिली होती परंतु हिम्मत असेल तर आणि आपल्या राज्यात सर्वांना कायदा समान असेल तरच या सरकारने इंदुरीकरांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा अंधश्रद्धा पसरवण्यात सरकारसुद्धा सामील आहे असे जनतेला वाटेल, असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.