आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय?  प्रकाश आंबेडकरांचा सवाल !

मुंबई – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान 3 च्या यशाचे कौतुक आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटेल असेच काम आहे. ह्या यशाबद्दल इस्रोच्या संपूर्ण टीमचे मनःपुर्वक अभिनंदन. पण, चंद्रावर यान पाठविणाऱ्या आपल्या देशातील जातीयवाद, जातीय द्वेष आणि त्याला बळी पडणाऱ्या मृत्यूचे काय? या वास्तावाबद्दल आपण कधी बोलणार आहोत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar ) यांनी केला आहे.

त्यांनी ट्विट करत देशातील महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर मांडून देशांतर्गत व्यवस्थेची यादीच मांडली. यासोबतच त्यांनी वास्तव दर्शवणारे फोटोही एकत्र जोडले आहेत. ते म्हणाले की, अजूनही भारतात अनेक ठिकाणी हाताने मैला उचलला जातो. हे लाजिरवाने काम आजही सुरूच आहे. जातीय भेदभाव, दलित, आदिवासी, ओबीसींवरील अत्याचाराच्या, भेदभावाच्या घटना दिवसेंदिवस वाढताय.

मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याक समुदायंवरील हल्ले आणि त्यांची वाढती असुरक्षितता. बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि स्त्रिया व मुलींवरील हिंसाचाराचे वाढते प्रमाण, तुटपुंजी आणि आवाक्याबाहेरची आरोग्य सेवा. गरिबी आणि बेरोजगार युवकांची प्रचंड वाढत जाणारी संख्या. आर्थिक, शैक्षणिक, व मूलभूत सोयीसुविधा नसलेले व यात पिळला जाणारा सर्वसामान्य तरुण. भाजप-आरएसएसकडून दलित, बहुजनांवर केली जाणारी दडपशाही, त्यांचे शोषण. याबद्दल जरा स्वतःलाच विचारुया की, आपल्याला ह्या वास्तवाबद्दल अभिमान आहे का ? कोणते रॉकेट आपल्याला विद्वेष, जातीयवाद आणि मृत्यूपासून दूर नेणार आहे? असा भेदक सवाल करून त्यांनी देशातील जात, वर्ग व्यवस्थेवर बोट ठेवले आहे.