रामाच्या नावाने राजकारण सुरू असताना आमचे काम समाजपयोगी – ॲड. ठाकूर

अमरावती – देशात सध्या रामाच्या नावाने राजकारण सुरू असताना, मात्र रामाच्या नावाने सुरू असलेली आमची संस्था समाजपयोगी काम करीत आहे. माझ्या आजोबांचे नाव रामचंद्र आणि वडिलांचे नाव चंद्रकांत असून वडिलांनी ही आजोबांच्या नावाने संस्था सुरू केली. याच संस्थेच्या माध्यमातून पुष्पमाला अभियान करण्याची घोषणा आज अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केली. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

राज्यात विविध ठिकाणी अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्ताने कार्यक्रम राबविले जात असताना अमरावतीतील महानगरपालिका शाळेच्या आवारात अमरावतीतील गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी आर्थिक दुर्बल कुटुंबातील ज्या मुलीला सायकल पाहिजे, त्यांच्यासाठी पुष्पमाला अभियानातून सायकल उपलब्ध केली जाईल. आमच्या रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्यावतीने पुष्पमाला अभियान राबविले जाईल, असे त्यांनी सांगितले. “माणूस मोठा नसतो, पद मोठ असतं आणि त्याहीपेक्षा काम गोड असतं. आणि “कार्यकर्त्यांसोबत राहीलं पाहिजे” ही कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची शिकवण असल्याचे त्या म्हणाल्या.

या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक माजी महापौर विलास इंगोले व अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत यांनी ताईचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच परिसरातील सर्व महिला भगिनींनीसुद्धा ताईचे औक्षण करून स्वागत केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी पालकमंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी खासदार अनंतराव गुढे माजी महापौर मिलिंद चिमोटे, बबलू शेखावत,अनिल भाऊ अग्रवाल, संपादक अमरावती मंडल बंडू हिवसे, धीरज हिवसे, सुनीताताई भेले, माजी नगरसेवक अहमद भाई, सुरेश रतावा, राजू भेले, गजानन राजगुरे, प्रमोद इंगोले यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.