संभाजीराजेंच्या पश्चिम महाराष्ट्रात तयार होणाऱ्या नेतृत्वाची धास्ती कुणाला? फडणवीसांचा सवाल

नागपूर – संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच त्यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केलेल्या दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संभाजीराजेंची व्यक्तिगत उमेदवारी नाकारली गेल्यामुळे घराण्याचा अपमान वगैरे झाल्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिली आहे.

शाहू महाराज म्हणाले, छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा यामध्ये प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. आमच्यामध्ये काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं (BJP) दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील त्यांनी चर्चा केली नव्हती. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं. याशिवाय ही सर्व खेळी फडणवीस आणि भाजप यांची असल्याचा देखील त्यांनी आरोप केला.

दरम्यान, आता यावर दस्तुरखुद्द विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात (West Maharashtra) संभाजीराजेंचा नेतृत्व चांगल्या पद्धतीनं तयार होत आहे. मात्र याची कोणाला धास्ती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. छत्रपती शाहू महाराजांना काही किडक्या लोकांद्वारे चुकीची माहिती असलेली स्क्रिप्ट दिली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, शाहू महाराज (Chatrapati Shahu Maharaj) आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा मोठा मान आहे. त्यामुळे त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलं तरीही मी त्या संदर्भात मी बोलणार नाही. या संदर्भात स्वतः संभाजीराजेंनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितलं आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरुण सांगतोय, की मी जे बोललो ते सत्य बोललो. ही प्रतिक्रीया बोलकी आहे.

मला एकाच गोष्टीचं दुखः आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करुन, आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसत आहे. त्या लोकांना हे समजत नाही की एकीकडे अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतायं. तर दुसरीकडे महाराजांमध्ये आणि युवराजांमध्ये काही तरी मतभेद आहे असं दाखवण्याच्या प्रयत्न करताय. त्यामुळे असे जे काम करताय त्यांच्या या वागण्याबद्दल मला प्रचंड दुखः आहे.

छत्रपती संभाजी राजे यांचं नेतृत्व गेल्या सहा वर्षात चांगल्याप्रकारे विस्तार झाला असून मराठा आणि बहुजन समाजात त्यांच्याबद्दल आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहे. याचा धोका कोणाला होणार होता, हे साधं राजकारण समजणाऱ्यालाही कळते. हे विस्तार थांबवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले असल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, केवळ रेकॉर्ड ठिक राहावं म्हणून सांगतो की, छत्रपीत संभाजीराजे मला भेटले होते त्या पूर्वीच त्यांनी अपक्ष उभे राहणार असून आमच्या घराण्याची परंपरा पाहता, मला सर्व पक्षांनी पाठिंबाद्यावा अशी त्यांची इच्छा होती. आमच्या पक्षाचे यासंदर्भातील निर्णय हायकमांड घेत असते, असे त्यांना सांगत सर्व पक्षांनी आपल्याला समर्थन दिल्यास मी हायकमांडसोबत या संदर्भात बोलणार असल्याचे आश्वासनही यावेळी मी दिल्याची कबूली त्यांनी दिली.