एकनाथ शिंदेंच्या मास्टर स्ट्रोकमुळे सत्तेसोबत पक्षही ठाकरेंच्या हातून जाणार?  

  मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

आमदार आसाममध्ये सध्या बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे आहेत. आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा त्यांनी केलाय. माझ्यासोबत असलेले शिवसेना आमदारहीच खरी शिवसेना आहे, असा दावा देखील त्यांनी केलाय. त्यामुळे नेमकं राजकीय घाडमोडींवर आता महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला जातोय. आनंद दिघे यांचा शिष्य असलेल्या एकनाथ शिंदे हे खऱ्या शिवसेनेचे (Shivsena) नवे पक्षप्रमुख असणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागलीय. एकीकडे संख्याबळाची जुळवाजुळव आणि दुसरीकडे खऱ्या शिवसेनेचं पक्ष प्रमुखपद, अशा दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेच्या वाट्याला येतात की काय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज? आजही समोर येऊन एकाने सांगितले तरी राजीनामा देण्यास तयार आहे असं त्यांनी सांगितले.

आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. पण समोर येऊन बोला.शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नका. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. पक्ष प्रमुख पदही मी सोडायला तयार आहे.  असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.