…आता एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतही येऊन जनतेला दिलासा द्या; सुजात आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत भावनिक आवाहन केले.

दरम्यान,  माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज? आजही समोर येऊन एकाने सांगितले तरी राजीनामा देण्यास तयार. आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे. पण समोर येऊन बोला.शिवसेनेचे लाकूड वापरुन घाव घालू नका. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं…. आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो… जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं.  असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतर सुजात आंबेंडकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. उद्धव ठाकरे साहेब आपण लाईव्ह येऊन ‘शिवसैनिकांना’ दिलासा दिलात उत्तमच..! आता एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत येऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेला दिलास द्या ना..?,  असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.