नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून १५० कोटी रूपये वितरित; पंकजा मुंडेंनी मानले सरकारचे आभार

बीड – अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाने स्वतःच्या हिश्याचे १५० कोटी रूपये आज वितरित केले. या निर्णयाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सरकारचे आभार मानत या निधीमुळे रेल्वेमार्गाच्या कामाला अधिक गती येईल असे म्हटले आहे.

नगर-बीड-परळी या २६१.२५ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा अंदाजित खर्च २८२६ कोटी रूपये इतका होता. प्रकल्पाच्या खर्चात केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा पन्नास -पन्नास टक्के इतका असल्याने राज्य हिस्सा १४१३ कोटी रूपये इतका होता. शासन निर्णयानुसार ४५०८.१७ कोटी रूपये इतक्या अंदाजित खर्चास राज्य शासनाने दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पाच्या खर्चापैकी रूपये २४०२.५९ कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा शासन मध्य रेल्वेला देणार आहे. ३१ मार्च २०२२ अखेर राज्य सरकारने १४१३ कोटी रूपये इतका निधी दिला असून हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन २०२२-२३ करिता १५० कोटी रूपये इतका निधी राज्याने आज मध्य रेल्वेकडे वर्ग केला आहे.

पंकजा मुंडे यांनी मानले आभार

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यानंतर पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या मार्गासाठी निधी खेचून आणला आहे. आज राज्याने १५० कोटीचा निधी दिल्याबद्दल पंकजाताईंनी "आभार सरकारचे आणि अभिनंदन बीड जिल्ह्याचे !!  असं ट्विट करत सरकारचे आभार मानले आहेत.