राज्यपाल बरळले पण आता भाजपनेही हात झटकले; कोश्यारी अक्षरशः एकाकी पडले

मुंबई : राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मुंबई-ठाण्यातून (Mumbai-Thane) जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाला असताना दुसरीकडे भाजप आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी देखील या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये! असं शेलार यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबींना जर आपण बघितलं तर, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेकदा अतिशोयक्ती अलंकार हा वापरला जातो, तशाच प्रकारे राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे की त्यांच्याही मनात मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही पूर्णपणे याची जाणीव आहे, की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात, या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक आहे. असं फडणवीसांनी बोलून दाखवलं.