चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्रीपदाबाबतचे वक्तव्य म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना : आशिष शेलार

मुंबई – वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाला आणि स्वतःला अडचणीत आणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा एक वक्तव्य चर्चेत आले आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांच्या जे पोटात आहे ते ओठात आल्याचे दिसून येत असून चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आल्याचं बोललं जात आहे.

पनवेलमध्ये आज भाजपच्या (BJP) राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले. परंतु, एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो ओहोत, अशी खदखद चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर आता आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलं ते तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मनातील भावना आहेत. चंद्रकांत पाटील यांनी फक्त त्या भावना व्यक्त करण्याचे काम केले, तो त्यांचा तो निर्णय नाही, असं मत भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी व्यक्त केलं आहे. तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या मनातील भाव चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. त्यांचा तो निर्णय नाही. शिवाय बैठकीतील त्यांचे भाषण बाहेर कसं आलं? हे पाहत आहोत, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे, असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.