येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच धोरण राबवणार – अजित पवार

Ajit Pawar: येत्या युवा धोरणात महाराष्ट्रातील युवकांसाठी ‘युवकांचा सर्वांगीण विकास’ हेच महत्वाचे धोरण राबवणार असल्याचे सांगतानाच आम्ही निवडणूकांसाठी राजकारण करत नाहीत तर युवकांसाठी काम करतो हे युवकांना वाटले पाहिजे. तुमच्याकडून चांगले प्रस्ताव आले तर त्याचा युवा धोरणात नक्कीच समावेश केला जाईल असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘युवा मिशन २०२४’ या महामेळाव्यात युवकांना दिला.

युवक म्हणजे सळसळतं रक्त… मेहनती… कष्ट करण्याची जिद्द त्यांच्यात असते. या वयात त्यांच्या डोळयात स्वप्न असते… ‘लाथ मारेन तिथे पाणी काढेन ही त्यांची ताकद आहे… बदलत्या काळानुसार बदलायला हवे… आपण जागृत राहण्याची आवश्यकता आहे असे मार्गदर्शनही अजित पवार यांनी युवकांना केले.

विरोधात कोण बोलत असेल तर तात्काळ प्रतिक्रिया दिली पाहिजे पण त्यातून पक्षाची बदनामी होणार नाही किंवा कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लोकशाही पध्दतीने खूप काही करता येते असेही अजितदादा पवार म्हणाले.

आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात आहोत. शिवसेनेसोबत आणि भाजपसोबत का गेलो त्यावर मी अनेकदा बोललो आहे. आता आपल्याला विकासावर भर द्यायचा आहे. एकाच धोरणावर अवलंबून न राहता समयसूचकता दाखवत पुढे जायला हवे असे स्पष्ट विचारही अजित पवार यांनी मांडले.

राष्ट्रवादीने नेहमीच युवकांना पुढे येण्यास मदत केली आहे. आज २५ वर्ष पक्षाला झाली आहेत. आता आपण सिल्व्हर जुबली साजरी करणार आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची युवा शक्ती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यास कमी पडता कामा नये असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

बहुमताला आदर देऊन पक्षात काम केले पाहिजे. हीच खरी लोकशाही असते. युवक पदाधिकारी निवड करताना जातीपातीचा, नात्यागोत्याचा असता कामा नये तर सर्व घटकांना सहभागी करून घेतले पाहिजे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

२००४ रोजी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता पण का झाला नाही याच्या खोलात आता जायचे नाही पण आता बघितले की, सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री होणार बोलत आहेत. पण पहिल्यांदा आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे असा सल्लाही अजित पवार यांनी युवकांना दिला.

एकटा अजित पवार आणि सोबतच्या फक्त इतर सहकार्‍यांनीच काम करायचे नाही तर आपण सर्व मिळून काम करायचे आहे. आपण भूमिका का घेतली हे पटवून सांगण्याची गरज आहे. वरीष्ठ समजून घेत नव्हते किंवा समजल्याचे फक्त दाखवत होते म्हणूनच आम्ही निर्णय घेतला. ४५ आमदार पाठीशी उभे का राहतात याचाही विचार करायला हवा होता असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

जगात आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे. ते अठरा – अठरा तास काम करतात. त्यांच्याकडे व्हिजन आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. ते शेतकऱ्यांना मदत करत आहेत. परकीय गुंतवणुकीत वाढ होत आहे. त्यांच्या व्हिजनचा फायदा महाराष्ट्राला करुन घ्यायचा आहे असेही अजित पवार म्हणाले.

तुम्ही समोर बसलेले राष्ट्रवादीचे भविष्य आहात. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो असलो तरी आपली विचारधारा कायम आहे. कुणाचे फोन आले तर हळवे बनू नका… चलबिचल तर अजिबात होऊ नका. मी तुम्हाला सारखा फोन करु शकणार नाही पण तुमच्या विकासासाठी नेहमीच काम करेन असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.

१२ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘स्वराज्य सप्ताहा’ निमित्ताने राज्यातील नागरिकांना सहभागी होण्यासाठी अजितदादा पवार यांनी पत्र लिहिले आहे. त्याचे वाचनही त्यांनी केले. तर १२ फेब्रुवारी स्वराज्य सप्ताहात घेतली जाणारी शपथ यावेळी युवा वर्गाला अजित पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

स्वतःच्या वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? Supriya Sule यांनी केलं भावनिक राजकारण सुरु

पाकिस्तानात राजकीय संघर्ष झाला सुरु; निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप

Test Cricket | ‘पुस्तकावर धूळ साचली म्हणून…’ निवड न झालेल्या भारताच्या वेगवान गोलंदाजाची सूचक प्रतिक्रिया