धक्कादायक! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाच्या लग्नात ७०० पेक्षा जास्त जणांना जेवणातून विषबाधा

औरंगाबाद जिल्ह्यातून मोठी बातमी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या (NCP) मुलाच्या लग्नात सुमारे ७०० लोकांना जेवणातून विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. लोकशाही मराठीने याबद्दल वृत्त दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कदिर मौलाना (Qadir Maulana) यांच्या मुलाच्या लग्नात (NCP Leader’s Son Marriage) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काल (०४ जानेवारी) हा प्रकार घडला असल्याचे समजत आहे.

कदिर मौलाना यांच्या मुलाचा निकाह काल रात्री औरंगाबादमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. मोठ्या प्रमाणात पाहुण्यांनीही या निकाहाला उपस्थिती लावली होती. परंतु जेवण केल्यानंतर एकामागोमाग एक जवळपास ७०० पेक्षा जास्त पाहुण्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना त्वरित वेगवेगळ्या रुग्णालयात (Food Poisoning At Wedding) नेण्यात आले. कोणाला पोटाचा त्रास होऊ लागला तर कोणाला मळमळ होऊ लागली. तिथे त्यांना विषबाधा झाल्याचे समजले. या घटनेने गोंधळून गेलेल्या कदिर मौलाना यांनीही स्वत: काही पाहुण्यांना रुग्णालयात भरती केले.

सुखद बाब म्हणजे, या घटनेतून आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही. बऱ्याचशा पाहुण्यांनी प्रकृती बरी असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काहींवर अजूनही उपचार सुरू असल्याचे समजत आहे.