उद्धव ठाकरेंच्या खोट्या शपथांना जनता बळी पडणार नाही- बावनकुळे

पोहरादेवीची खोटी शपथ घेतल्यानंतर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

Mumbai – खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर मोदीजी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी केली आहे.

बावनकुळे म्हणाले,  युती करताना तुम्ही देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलं आणि निवडणुकीनंतर शरद पवारांनी हात पुढे केल्यावर भाजपसोबत गद्दारी केली. मतदान युती म्हणून मागितलं आणि सत्ता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केली. अर्थात गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात.

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला. आता ही जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही.अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.