लढाई त्यांनी सुरु केली असली तरी त्याचा अंत आपण करणार – सुप्रिया सुळे

नाशिक – माझ्या विचारांशी माझी निष्ठा आहे. मला पद नाही मिळाले तरी माझा विचार मी कधी सोडणार नाही. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणारा हक्काचा माणूस शरद पवारसाहेब आहेत. त्याच्याविरोधात षडयंत्र सुरु आहे म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाविरोधात आणि आपल्या राज्याचे महत्व कमी करण्याचे षडयंत्र दिल्लीचा अदृश्य हात करतोय. समोर कोणीही बसला असेल तरी त्याविरोधात आम्ही लढा दिल्याशिवाय शांत बसणार नाही. सेवा, सन्मान, आणि स्वाभिमान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून लढाई त्यांनी सुरु केली असली तरी त्याचा अंत आपण करणार असा थेट इशारा राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिला.

येवलामध्ये आल्यावर कांद्याचे क्रेट पाहिल्यावर वर्षभर केंद्रसरकारशी कांद्याच्या भावावर भांडण केले याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांना करून दिली.  ‘संवाद जनतेसोबत’ या पक्षाच्या सभेला त्यांनी संबोधित केले.

जगात कांदा कमी आहे, आपल्या देशात कांदा उत्पादन जास्त झाले असल्याने आपला कांदा परदेशात पाठवण्याची मागणी केली. पण भाजपने कांदा बाहेर जाऊ न दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केंद्रसरकारवर केला. कांद्यासोबत शेतकऱ्यांच्या टोमॅटोला भाव देत नाही. शहरात टोमॅटो महागले आहेत मग मधले पैसे जातात कुठे असा प्रश्नही खासदार सुप्रिया  सुळे यांनी उपस्थित केला.