भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा;मात्र महाराष्ट्रात तसं काही होणार नाही,पोलिसांचे लक्ष आहे – वळसे पाटील

मुंबई –  भोंगे उतरवण्याचा भाजपचा (BJP ) अजेंडा आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे मात्र महाराष्ट्रात तसं काही होईल असे वाटत नाही पोलीस लक्ष ठेवून आहेत अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसेपाटील (Dilip Valase patil) यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

भाजपच्या या अजेंडयाची सुरूवात कर्नाटक राज्यातून झाली आहे व अन्य राज्यांमध्येही हा अजेंडा भाजपने सुरू केला आहे असेही दिलीप वळसेपाटील म्हणाले. आज राज्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा आपापल्यापरीने लक्ष ठेवून आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्था असाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन दिलीप वळसेपाटील यांनी केले.

संजय राऊत (Sanjay raut) यांना कोणतीही नोटीस न देता किंवा चौकशी न करता कारवाई ईडी (ED) करत असेल तर केंद्रसरकारचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे हे लक्षात येत आहे. मात्र यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.