मध्यान्ह भोजनाचा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ; उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न – पाटील

मुंबई  – यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर शाळा प्रशासन करत आहेत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्वीट करत केंद्राचे लक्ष वेधले आहे.

कॉन्ट्रॅक्टर, टेंडर प्रक्रिया, धान्याचा वेळेत पुरवठा न होणे असे बरेच मुद्दे समोर येत आहेत. मात्र मूळ मुद्दा हा आहे की, त्याचा थेट परिणाम मध्यान्ह भोजन योजनेवर आणि आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांवर होत आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे जिल्हा परिषद शाळांना आधुनिक स्वरूप देण्याचा स्थानिक पातळीवर प्रयत्न आम्ही करत आहोत. तर दुसरीकडे मुख्य आधार असलेली ही योजना ढिसाळ नियोजनामुळे कोलमडत आहे. राज्यसरकारने तात्काळ हस्तक्षेप करून या योजनेतील त्रुटी दुरुस्त कराव्यात असे आवाहन करतानाच विद्यार्थी घडला तरच समाज घडेल! याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.