शिवसेना नव्हे तर ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांचे ग्रामपंचायत निवडणूक निकालावर भाष्य

Mumbai – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde), भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. दरम्यान, या लढाईत भाजप (BJP) आणि शिंदे गटाची सरशी होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये एक पोस्टरही आहे. या पोस्टरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसेच जनतेचा कौल म्हणत राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी मांडण्यात आली आहे. यातच एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे. यानुसार, या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.