देवेंद्र फडणवीस सरकारने गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्याचा प्रयत्न केला –  बावनकुळे

मौदा : देवेंद्र फडणवीस सरकारने (Devendra Fadnavis Government) गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी मेगा सर्च ऑपरेशन राबविण्यात आले असून, राज्य सरकारच्या निर्णयांमुळे येथील नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला होता. या संपूर्ण घडामोडींचा साक्षीदार राहिलो असल्याच्या भावना राज्याचे माजी मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule)  यांनी व्यक्त केल्या.

मौदा येथे शहीद अमृत प्रभुदास भदाडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी आ. चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी आ. टेकचंदजी सावरकर, शिवराजजी गुजर, तापेश्वरजी वैद्य, राजाभाऊ तिडके, देवेन्द्रजी गोडबोले, तुळशीराम काळमेघ, भारतीताई सोमनाथे प्रामुख्याने उपस्थित होते.

आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्याला नक्षल चळवळीने अक्षरशः पोखरून टाकले होते. तेथे विकास होत नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार स्थापन झाले आणि नक्षलमुक्त गडचिरोलीचे अभियान प्रारंभ झाले. त्या पाच वर्षात राज्य सरकारकडून झालेल्या कारवायांनी नक्षल चळवळ पूर्णतः हादरून गेली होती.

१ में २०१९ रोजी गडचिरोलीच्या कुरखेडा भागात नक्षल्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेत सुमारे १५ जवानांचे जीव गेले. सुरक्षा दलाची मोठी हानी झाली असल्याचे यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मौदा वासियांनी शहीद अमृत भदाडे यांचे स्मारक उभारून त्यांच्या योगदानाच्या स्मृती अमर केल्या आहेत. शहीद अमृत भदाडे यांचे साहसी जीवन नव्या पिढीला माहीत व्हावे यासाठी हे स्मारक महत्वाचे ठरणार आहे. आगामी काळात शहीद अमृत भदाडे यांच्याच नावाने मौदा ओळखले जावे, अशी अपेक्षा यावेळी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर, तहसिलदार मलिक विराणी, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे, भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नरेशजी मोटघरे, माजी सरपंच मोरेश्वरजी सोरते, जि. प. सदस्य अरुण हटवार, ज्ञानेश्वरजी वानखेडे, मुन्ना चलसानी, राजू सोमनाथे, हंसराज भदाडे, गुड्डू जयस्वाल, दुर्गाताई राजू ठवकर, शालिनीताई कुहीकर, राजेश निनावे, राजेन्द्र लांडे, किशोर सांडे, प्रदिप मधुकर भदाडे, शुभमजी तिघरे, राजू ठवकर, सतीश भोयर, नितेश वांगे, देवाजी कुंभलकर उपस्थित होते.