पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झालं होतं त्याला शरद पवार यांची संमती होती; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Mumbai – २०१९ साली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार (MVA ) होण्यासाठी हालचाली वाढल्या होत्या. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Devendra Fadnavis and Ajit Pawar) यांनी पहाटे शपथ घेत काही तासांचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झालं होतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवे वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे.”असं ते म्हणाले आहेत.