‘जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी खोटं बोलू शकतात, असे मुख्यमंत्री अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटं बोलू शकतात’

मुंबई – संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. शिवसेनेने दोन उमेदवार दिल्यामुळे अपक्ष लढणाऱ्या संभजीराजे ( Chatrapati Sambhajiraje ) यांची मोठी अडचण निर्माण झाली होती. यातच आज त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली.

संभाजीराजे छत्रपती (sambhajiRaje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत (Sambhaji Raje Press Conference) ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “मागील १५ ते २० वर्षांपासून मी घर सोडून काम करतोय. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. कुणी मला राज्यसभेत पाठवलं, हे न पाहता समाजाची भूमिका प्रांजळपणाने मांडली. हे सगळं लक्षात घेऊन मी सर्वांना राज्यसभेत पाठवण्याचं आवाहन केलं होतं,” असं संभाजीराजे म्हणाले.

राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. मी मुंबईत आलो. मी जे बोलणार आहे, ते बोलण्याची इच्छा नाही. माझ्या तत्वात, स्वभावात, हे नाही. पण मला ते बोलायचं आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असो वा पुतळा. आपण दोघांनी तिथं जाऊ. शिवाजी महाराजांचं स्मरण करायचं आणि जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल, तर तुम्ही आधी सांगा, असं आव्हान संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळला नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, पण ही माझी माघार नसून स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान, जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी खोटं बोलू शकतात, ते मा. अमित शहा यांच्याशीही बोलू शकतात. “त्यामुळे बंद दरवाजाआड वचन दिलं होतं” हे खोटं कोण बोलतंय हे आज महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे उमगले आहे अशी बोचरी टीका भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

जे महाराष्ट्राच्या छत्रपतींशी, ते सुद्धा त्यांच्या विषयाकरिता खोटं बोलू शकतात, असे मुख्यमंत्री अमित शहा यांच्याशी तर सहजतेने खोटं बोलू शकतात हे आज पूर्णपणे सिद्ध झाले आहे अशी टीका आ. भातखळकर यांनी यावेळी केली. तसेच कुठल्याही मुख्यमंत्रीपदाचे वचन हे त्यांना दिले गेले नव्हते परंतु केवळ सत्तेच्या लालसेपायी स्वतः मुख्यमंत्री व्हायचे आणि स्वतःच्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचे म्हणून हिंदुत्व, मराठी बाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे, हेच आजच्या छत्रपती संभाजीराजेंच्या विधानांवरून सिद्ध झालेले आहे असे म्हणत आ. भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.