Devendra Fadnavis | स्वामीजींनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य केले- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis – स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याच्या महायज्ञात समिधा अर्पण करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. स्वामीजींकडून देशाची आणि भारतीय विचारांची सेवा यापुढेही घडावी, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

आळंदी येथे आयोजित गीताभक्ती अमृत महोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), अयोध्या येथील कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महाराज, अवधेशानंद महाराज, ह.भ.प.मारोतीबाबा कुरेकर, राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रामदेव महाराज, रमेशभाई ओझा, आमदार उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, गिरीधर काळे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी भागवत धर्माची पताका फडकत ठेवली. ज्या भूमीतून हे कार्य झाले त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत अनेक संत एकत्रित आले आहेत असे नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतातील सर्व संतांनी आपले जीवन भारतीय संस्कृती आणि मूल्यांच्या प्रसारासाठी दिले. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांनी ८१ देशात लाखो लोकांपर्यंत भगवद्गीता पेाहोचविण्याचे कार्य केले. ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला सामान्यांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचविले, त्या माऊलींच्या भूमीत गीता प्रसाराचे कार्य करणाऱ्या विद्वानाचा सत्कार होणे हा चांगला योग आहे. स्वामी गोविंददेव गिरी यांनी राष्ट्राची आणि सृष्टीची चिंता केल्याने त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित आहे, असे फडणवीस म्हणाले.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आपल्या मधूर वाणीने आध्यात्म विचाराच्या प्रसाराचे कार्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काम करणाऱ्या स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या हातून यापुढेही देशसेवा घडावी, अशा शुभेच्छा सहकार मंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या.

स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, गीता परिवार, महर्षी वेद व्यसास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवा निधी आणि संत श्री ज्ञानेश्वर गुरूकुलाच्या माध्यमातून स्वामीजींनी गेली अनेक वर्षे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा, वेदवाङ्मयाबाबत देशविदेशात प्रबोधनाचे काम केले आहे. व्रतस्थ वृत्तीने त्यांचे कार्य आजही सुरू आहे. आध्यात्मिक मूल्यांचे पालन, संवर्धन करतांना त्यांनी आध्यात्म विचार सर्वदूर पोहोचविला.

यावेळी इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी