‘देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भावासारखे प्रेम केले, मात्र…’

Nagpur – राहुल गांधी, प्रियंका गांधी (Rahul Gandhi, Priyanka Gandhi) यांनीही नागपुरात सभा घ्यावी, त्याने फरकही पडणार नाही. महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेला आमचा विरोध नाही. मात्र नियम तोडले तर पोलिस बघतील, सामाजिक तेढ निर्माण झाली तर सरकार बघणार आणि सभेतून त्यांना काय बोलायचे आहे ते बोला..त्यावर काय बोलायचे हे मग मी बघेन,  असा सणसणीत टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी लगावला.

नागपूर येथे ते माध्यमांशी बोलत होते.  बावनकुळे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. देवेंद्रजी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना भावासारखे प्रेम केले. मात्र सत्ता गेल्यावर नैराश्यातून व्यक्तिगत टीका करीत आहे. त्यांना शेवटचे सांगतो, भाजपच्या नेत्यांवर यापुढे व्यक्तिगत टीका केली तर भारतीय जनता पार्टी त्याचं कसं उत्तर देईल हे पुढच्या काळात दिसेल.

भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रात’ घर घर चलो’ अभियान सुरू करणार असून त्यामाध्यमातून तीन कोटी लोकांना जोडणार आहोत. पुढील काळात समृद्ध सशक्त भारत निर्माण करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकचा पक्ष असेल. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश आत्मनिर्भर होत आहे. त्यांच्याबद्दल संजय राऊत बोलून वातावरण खराब करीत आहेत. त्यामुळे राऊतांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आम्हाला रस नाही, असेही  बावनकुळे म्हणाले.