शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावापासून पिकांचे करा ‘असे’ संरक्षण

पेरणीपूर्वी करावयाच्या उपाययोजना आणि उगवणीनंतर करावयाच्या उपाययोजना

गोगलगाय ही बहुभक्षी कीड असून ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे अधाशासारखे पाने खाऊन अतोनात नुकसान करते. निशाचर असल्याकारणाने रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या गोगलगायी रोपांची पाने खातात व शेताचे नुकसान करतात. जून ते सप्टेंबर या काळात गोगलगायी अत्यंत सक्रिय असतात व रोपावस्थेतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे पीक पूर्ण नष्ट होते. केवळ एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही. हा उपद्रव टाळण्यासाठी एकाच वेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मुलन करणे आवश्यक आहे.

शंखी गोगलगायीसाठी पोषक वातावरण

शंखी गोगलगायीला पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान  पोषक आहे. शंखी गोगलगाय अतीथंड व अति उष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्रयाने बंद करुन झाडाला अथवा भिंतीला चिटकून सुप्त अवस्थेत जातात. आगामी हंगामात खरीप मागील वर्षी प्रमाणेपरिस्थिती उद्भवू नये, यासाठी शेतकरी बांधवांनी जास्त सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

पेरणीपूर्वी करावयाच्या उपाययोजना

उन्हाळ्यात खोल नांगरट करून घ्यावी. जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी वरील थरात येऊन कडक उन्हाच्या मदतीने नष्ट होतील. तसेच सोयाबीनच्या पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती (बांधाच्या आतल्या बाजूने) पाच सेंटीमीटर रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा. सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड 2.5 टक्के (स्नेलकिल) या औषधाच्या प्लेटला कट करून बारीक गोळ्यात रुपांतर करावे आणि संपूर्ण शेताच्या भोवती (बांधाच्या आतल्या साईडने) 5 ते 7 फुट अंतरावर एक गोळी टाकावी. या गोळीला चाटल्यानंतर 4 ते 5 तासांनी गोगलगायीच्या आतला स्त्राव बाहेर येऊन ती नियंत्रणात येते.

सोयाबीनच्या उगवणीनंतर करावयाच्या उपाययोजना

बांध्याव्यतिरिक्त आत शेतामध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला असेल तर प्रत्येक चार ओळीनंतर ओळीच्या बाजूने 5 फुट अंतरावर स्नेलकिल औषधाच्या गोळ्या टाकाव्यात. रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रति एकरी दहा ठिकाणी ठेवावा. सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान ढिगाखाली किंवा बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात.

सामूहिकरीत्या उपाययोजना करणे आवश्यक

गोगलगाय नियंत्रणासाठी सामुहिक मोहीम राबवणे आवश्यक. शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या उपाययोजना पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.