युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा पंतप्रधानांना या देशातील निवडणूका महत्त्वाच्या – जयंत पाटील

मुंबई   – शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते परंतु त्यांना उत्तरप्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

माध्यमांनी युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले असून भारतातील विद्यार्थी अडकले असल्याचे विचारले असता जयंत पाटील यांनी केलेल्या ट्वीटची आठवण करून दिली. ज्यावेळी निवडणूका देशात सुरू होतात त्यावेळी केंद्रसरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना कशातच रस नसतो असा अनुभव आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

युक्रेन मध्ये आपले विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणा असे आठ दिवसापूर्वी केंद्रसरकारच्या प्रमुखांचे लक्ष ट्वीटच्या माध्यमातून वेधले होते परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

युक्रेन मध्ये कालपासून युध्द सुरू झाले आहे. या संकटात विद्यार्थी सापडले आहेत. मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते. आज ते असुरक्षित आहेत. याची नोंद अगोदरच घ्यायला हवी होती परंतु केंद्रसरकारने घेतली नाही आतातरी नोंद घेतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.