फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला, असे अनेक शस्त्र येणाऱ्या काळात बाहेर निघतील – बावनकुळे

नागपूर : महाराष्ट्र अशांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चोकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील असा दावा भाजपा प्रदेशचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली. त्याच नोटिशीचा निषेध करण्यासाठी रविवारी नागपुरातील हजारो भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी नोटिशीची होळी करण्यात आली.

या आंदोलनाला प्रामुख्याने पद्मश्री खा. विकासजी महात्मे, माजी मंत्री अनिल बोन्डे, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, आ. कृष्णाजी खोपडे, माजी आमदार सुधीरजी पारवे, माजी आमदार गिरीशजी व्यास, प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, महामंत्री अविनाशजी खळदकर, शहर भाजयुमोचे अध्यक्ष पारेन्द्र पटले, ग्रामीण भाजपायुमोचे अध्यक्ष आदर्श पटले, विशाल भोसले, संजयजी फांजे उपस्थित होते.

आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्रजी फडणवीस यांनी उघड केलेल्या पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा राज्य सरकारने तपास करावा. माहितीचा स्रोत विचारण्यापेक्षा ती खरी की खोटी याची चौकशी करावी आणि दोषी मंत्र्यांवर कारवाई करावी. नोटीस पाठवून देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर राज्य सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. हे चुकीचे आहे. अशा दबाव तंत्राने भाजपाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. आम्ही महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेपर्यंत पोहोचून राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करू.

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सरकार मधील भ्रष्टाचार आणि नियमबाह्य गोष्टी बाहेर आणण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्याच अधिकारान्वये देवेंद्रजी फडणवीस माहिती विधिमंडळात आणि जनतेसमोर मांडत असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.