पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार – सामंत

मुंबई : पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता.

सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार मी.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून ग्रामपंचायत काळात अस्तित्वात असलेल्या नांदेड विहीर येथे पाणी आणून या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून या गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या वितरण व्यवस्थेमधून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने समाविष्ट ११ व २३ गावांकरीता पाणीपुरवठा करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरू आहे. या गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मंत्री  सामंत यांनी यावेळी सांगितले.