शेतात पीकं असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली,ते शेतकरी बहुजन नाहीत का?

 Pune – भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या पुण्यातल्या सभेत केला,कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखाच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल असं म्हणत पडळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.

पडळकर म्हणाले,तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये  १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का?  शेतात पीकं असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली,ते शेतकरी बहुजन नाहीत का? आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळं एसी,एसटी ,भटके विमुक्त कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवलं गेलं, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होतं?धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात करू शकला नाहीत. हे तुमचं कोणत बहुजन धोरणं होतं? असे थेट सवाल पडळकर यांनी उपस्थित केले आहेत.

सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला, पण जेंव्हा आम्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात. कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता. मुळात तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या.

बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवता. हे बहुजन समाज विसरलेला नाही.आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता.हे बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन  केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो. असं पडळकर यांनी म्हटले आहे.