स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घ्या, राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार 

Pune –  स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका वेळेत घ्या, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. आज दिल्लीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) याचिका दाखल करणार आहेत.

शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने 15 दिवसांमध्ये निवडणुका घ्या असे आदेश दिले होते. असे असताना देखील उशीर करत असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात येणार आहेत.

पुण्यात महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यी प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. तो बदलून शिंदे-फडणवीस सरकारने(Shinde-Fadnavis government)  4 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे. 80 टक्के निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाली आहे. तीन सदस्यीय रचनाही अंतिम झाली आहे. तरी भाजपने आपल्या फायद्यासाठी आता चार सदस्यीय रचना तयार केली आहे. आगामी निवडणुकीसाठीची सगळी कामे झाली असताना हा निर्णय घेऊन उगाच वेळ घालवला जात असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलं आहे.