एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ? जयंत पाटील यांचा शिंदेंना टोला

मुंबई – एवढ्या कमी कालावधीत एखाद्याचे मत परिवर्तन कसे होऊ शकते ? असा टोला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहात एकनाथ शिंदे यांना लगावला.सरपंच, नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणुक घेण्यासंबंधीचे विधेयक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात मांडले. यावर बोलताना जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनीच हे विधेयक अस्तित्वात येणे कसे चूक आहे यासाठी वकिली केली होती. त्यावेळी त्यांचा उत्साह इतका होता की आम्हीही प्रभावित होऊन त्यांच्या सूचनेला पाठिंबा दिला. त्यांनी इतकी चांगली वकिली केली की देवेंद्र फडणवीसही त्यांना विरोध करू शकले नाही. आज ते पुन्हा सांगत आहेत की थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडायचे यावर जयंत पाटील यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.