‘मराठवाड्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी समजतो’

औरंगाबाद – विविध योजना आहेत, प्रकल्प आहेत ते येत्या काळात पूर्ण होतील आणि मराठवाड्याला अतिरिक्त पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. परंतु मराठवाड्यात पाण्याची मोठी कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला जे शक्य आहे ते करणे मी माझी जबाबदारी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

मराठवाड्याकरीता मध्य गोदावरी उपखोऱ्यात १९.२९ टीएमसी व पैनगंगा उपखोऱ्यात मराठवाडा व विदर्भाकरीता ४४.५४ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन मधल्या काळात महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाने केले. याबाबत मराठवाडा अभियंता मित्र मंडळ, औरंगाबादच्यावतीने आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि जलसंपदा विभागाचे सचिव अजय कोहिरकर यांचा सत्कार करण्यात आला.

अजय कोहिरकर यांनी जलसंपदा विभागात कार्यरत असताना अनेक चांगले निर्णय घेतले. नेहमीच त्यांच्याकडे मराठवाडा विभाग आला असल्याने त्यांना मराठवाड्याच्या पाण्याची चांगली जाण आहे. कोहिरकर यांनी निस्वार्थी मनाने शासनाची सेवा केली. असे चांगली अधिकारी मिळणे मधल्या काळात जरा दुरापास्त झाले आहे म्हणून एका चांगल्या अधिकाऱ्याचा सत्कार करण्याची संधी दिली त्याबाबत जयंत पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले.

मागच्या कालखंडात पाण्याच्या अडचणींमुळे मराठवाड्यातील काही प्रकल्प थांबले होते. मराठवाड्यातील या थांबलेल्या प्रकल्पांना गती मिळणे आता शक्य झाले आहे, पाण्याची मोठी तूट भरून निघणार आहे. या कामगिरीबाबत मला माझ्या सर्व अभियंत्यांबाबत अभिमान आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी कौतुक केले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोकणातून लिफ्ट करून मराठवाड्यात पाणी आणणे शक्य आहे असे सांगतानाच जयंत पाटील यांच्याकडे हे करून दाखवण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे असे स्पष्ट केले. तर धनंजय मुंडे यांनी जयंत पाटलांना मराठवाड्याचे भगीरथ अशी उपाधी देत मराठवाडा पाणीदार करा. आम्ही सर्वजण तुम्हाला दंडवत घालू, समस्त मराठवाडा मिळून तुमचा गौरव करू अशा शब्द यावेळी दिला.

यावेळी मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री सांदिपान भुमरे आदींनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि विभागाचे कौतुक केले. यावेळी अजय कोहिरकर सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. निवृत्त सचिव गायकवाड यांनी जयंत पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.