राज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं – भाजपा

दौंड – आजचे आंदोलन हे या आघाडी सरकारला आपण देत असलेला इशारा आहे .आज नऊ दिवस झाले संपूर्ण राज्यातील विद्युत पुरवठा या सरकारने बंद केला आहे . अनैतिक युती करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे . राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांची टोळी सत्तेत आलेली आहे असा घणाघाती आरोप भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला .

वीज पंपाची वीज तोडु नये, तोडलेली वीज कनेक्शन तातडीने जोडावेत , शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येऊ नये या मागण्यांसाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालय दौंड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजपा किसान मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काळे हे बोलत होते.

आटली की बाटली कचकन फुटली… वीज पुरवठा खंडित करायला लाज नाही वाटली… खंडित वीज पुरवठा सुरू झालाच पाहिजे… शेतकरी एकजुटीचा विजय असो, एकच चर्चा किसान मोर्चा, अरे कोण म्हणतो देत नाय… घेतल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी या आंदोलना वेळी आंदोलकांनी केली.