‘मी म्हटलं निवडणुका नाहीत, उगीच कशाला भिजत भाषण करायचं’

पुणे – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेतल्यापासून ते कायम चर्चेत राहिले आहेत. या वादग्रस्त मुद्द्यावरून त्यांनी आक्रमक होत आधी पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात उत्तर सभा आणि नंतर पुन्हा मुंबईत झालेल्या सभांमधून तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातच राज ठाकरेंचा अयोध्या दौरा (Ayodhya), त्याला भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांनी केलेला विरोध आणि त्यानंतर राज ठाकरेंनी स्थगित केलेला दौरा या सगळ्याच मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली.

यावेळी ते म्हणाले, आपल्या सभांना हॉल वगैरे परवडत नाही. पण मी पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं एसपी कॉलेज बघा. त्यांनी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही. नदीपात्राचा विषय झाला. पण एकूणच सध्याचं हवामान पाहाता कोणत्याही वेळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसतायत. मी म्हटलं निवडणुका नाहीत, काही नाही, उगीच कशाला भिजत भाषण करा. येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, की आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं. असं देखील त्यांनी सांगितलं.