मविआचे मंत्रीच माथी भडकाविणार असतील तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची!

मुंबई – त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकाविणारी, चिथावणी देणारी विधाने भर मंचावरून करीत असतील, तर या दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे सांगत सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे हे दुर्दैवी आहे. त्रिपुरा सरकार आणि तेथील पोलिसांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे. जी मशिद जाळली गेली, असा आरोप केला आहे, तशी मशिद जाळण्याची कोणतीही घटना झालेलीच नाही. त्या मशिदीचे फोटो सुद्धा जारी करण्यात आले. त्यामुळे केवळ खोटा प्रचार केला गेला.

ज्यांनी खोटा प्रचार केला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. पण, निव्वळ अफवेवर मोर्चे काढण्यात आले. जाळपोळ करण्यात आली आणि हिंदूंची दुकाने जाळली गेली. अमरावतीतील घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. हा एका सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटतो. अशात राज्य सरकारमधील मंत्रीच जर भावना भडकावित असतील, तर हे अधिकच गंभीर आहे. अशात वातावरण चिघळल्यास दंगलींची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर असेल. सर्वांनी शांतता पाळावी, हे माझे सर्वांना आवाहन आहे असं फडणवीस म्हणाले.