जायकवाडी धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावे – पाटील

मुंबई – जायकवाडी हे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत येणारे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे अशी संकल्पना राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी मांडली.

आज मंत्रालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ तसेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत बोलत होते.

जायकवाडी हे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत येणारे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे. दरवाजे सेंट्रलाईज पद्धतीने उघडावे, पाण्याची चोरी झाली तर त्याची तात्काळ माहिती मिळावी अशा सर्व व्यवस्था असायला हव्यात. परभणी, नांदेड या भागात अनेक ठिकाणी पाण्याचा मोठा दुर्भिक्ष आहे, अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नाही. या भागातील कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवायचे असेल तर ही व्यवस्था आपल्याला करावीच लागेल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान या संकल्पनेबाबत जागतिक पातळीवर अभ्यास करण्याच्या सूचनाही जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीत महामंडळातंर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच विविध प्रकल्पांत येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली. काही महत्त्वाचे प्रश्न या बैठकीदरम्यान चर्चेला आले त्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिल्या. या प्रश्नांची सोडवणूक करून या भागातील सिंचन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न येत्या काळात केला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.