‘भाजपच्या कमळाची एकही पाकळी या महाराष्ट्रात शिल्लक न ठेवण्याची शपथ आपण सर्वांनी घेऊया’

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत.

दरम्यान,केवळ भाजपच नव्हे तर सोशल मिडीयावर सामान्य जनता देखील राऊत यांना ट्रोल करत असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते रविकांत वर्पे यांना मात्र कालची पत्रकार परिषद ही भारतीय जनता पक्षाची आणि नेत्यांची पिसे काढणारी व चेहरा उघडा पाडणारी पत्रकार परिषद होती असा अजब दावा केला आहे.

वर्पे यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली असून आजचा हा फक्त ट्रेलर असून अजून संपूर्ण चित्रपट बाकी आहे. येणाऱ्या काळात भाजपच्या नेत्यांनी मुंबईच्या जीवावर कमावलेल्या आणि ब्लॅकमेल केलेल्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीचे फोटो, व्हिडीओ क्लिप समोर येणार आहेत असं म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, मराठी माणसाने व्यवसाय करू नयेत म्हणून किरीट सोमय्यांना भाजपाने पुढे केलेले आहे. ईडी, सीबीआयची भीती दाखवून मुंबईतील रिअल इस्टेट व्यावसाय सोमय्या ताब्यात घेऊ पाहत असून त्या माध्यमातून भाजपला प्रचंड पैसा पुरवला जात आहे व भाजपा तो निवडणुकीत वापरत आहे.

मराठी माणसांनो, भाजपाचा नंगानाच ठेचण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या आरोपांना जशास तसे उत्तर देण्याची सुरवात आजपासून झालेली आहे. भाजपच्या कमळाची एकही पाकळी या महाराष्ट्रात शिल्लक न ठेवण्याची शपथ महाराष्ट्र म्हणून आपण सर्वांनी घेऊया असं देखील वर्पे यांनी म्हटले आहे.