देशाच्या GDP चे वाट्टोळे करून मोदी सरकार DP बदलायला सांगत आहे

मुंबई –महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) नेतृत्वाखाली ब्रिटिश सत्तेला ‘भारत छोडो’ (Bharat Chhodo Andolan) जनआंदोलनाचा नारा दिला त्यावेळी भाजपची (BJP) मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या आंदोलनात भाग घेतला नाही. जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांविरोधात लढत होता ते जे लोक इंग्रजाच्या बाजूने लढत होते आज देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांना राष्ट्रभक्तीचा उमाळा आला आहे परंतु त्यांचे हे राष्ट्रप्रेम बेगडी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आझादी गौरव पदयात्रेत सेवाग्राम येथे सहभाग घेतला, त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्यांशी संबंधित कोणताही पक्ष वा संघटना यांनी सहभाग घेतला नाही. देश ब्रिटिशांच्या विरोधात एकवटला होता. महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा नारा दिला होता त्यावेळी इंग्रजांनी गांधींची, पंडीत नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यासह काँग्रेसच्या (NCP) सर्वच महत्वाच्या नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले होते. पण देशातील सामान्य जनतेने हे आंदोलन हाती घेतले. अरुणा असफ अली या तरूणीने ऑगस्ट क्रांती मौदानात तिंरगा फडकवला. काँग्रेस पक्षाचे लाखो कार्यकर्ते चले जावो आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाचे या स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान आहे. तिरंग्याखाली देश एक झाला असताना भाजपाची मातृसंस्था आरएसएस यापासून दूर राहिली. आज देशाचा जीडीपी घसरला आहे पण तो सावरण्याऐवजी डीपी बदलण्याला मोदी सरकार प्राधान्य देत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सोवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ७५ किमीच्या आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सेवाग्राम येथून वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित पदयात्रेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री रणजित कांबळे, माजी मंत्री सुनील केदार, आ. अभिजित वंजारी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चंदोरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संगमनेर शहरात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक संगमनेर शहरातून आजादी गौरव पदयात्रेची सुरुवात केली आहे. सर्वसमावेशक भारत घडविण्यात काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे. आजादी गौरव यात्रेच्या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण आणि गेल्या 75 वर्षात देश उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने आम्ही राज्यभर आजादी गौरव पदयात्रा काढली आहे.

काँग्रेसचे अधिवेशन, स्वातंत्र्याचा लढा, चलेजाव चळवळ यामध्ये संगमनेरच्या मातीतील स्वातंत्र्य सैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्या सर्वांचे स्मरण लढाईला बळ देते. स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी 1947 मध्ये संगमनेर मध्ये ऐतिहासिक अशोक स्तंभाची पायाभरणी करण्यात आली, त्याचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे यांचा यथोचित सन्मान केला आणि या लोक लढ्यातील वीरांच्या योगदानाला वंदन करण्यात आले.

साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, परभणीमध्ये विधानसेचे मुख्य प्रतोद आ. सुरेश वरपुडकर, धुळ्यात प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, नांदेड मध्ये विधानपरिषदेतील गटनेते आ. अमर राजूरकर, बुलढाण्यात AICC सचिव हर्षवर्धन सपकाळ, जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुल बोंद्रे, अमरावतीमध्ये माजी मंत्री यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखेडे, मा. आ. विरेंद्र जगताप, नागपूरमध्ये माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, विलास मुत्तेमवार, पुणे जिल्ह्यात माजी मंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, चंद्रपूरमध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आ. सुरेश धोटे, आ. प्रतिभा धानोरकर यांनी पदयात्रेत सहभाग घेतला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातही आजपासून आझादी गौरव पदयात्रेला प्रारंभ झाला असून १४ तारखेपर्यंत ही पदयात्रा सुरु राहणार आहे. प्रदेशाध्यक्ष बुलढामा जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित आझादी गौरव यात्रेत शेगाव येथून सहभागी होणार आहेत.