एज्युयूथ मीट कार्यक्रमात १ लाख २३ हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

नव्या शैक्षणिक धोरण व तणावमुक्त शिक्षणासंदर्भात श्री श्री रविशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. श्री श्री रविशंकर म्हणाले, भारताला नशामुक्त तरुणाईच करू शकते. यासाठी ध्यान आणि योग करा जीवन गमावून आत्महत्या करू नका, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : वर्षानुवर्षे आपण आंधळेपणाने शिक्षण घेत आहोत. जुन्या अभ्यासक्रमातील प्रचंड माहितीच्या ओझ्याने आपण दबले गेले आहोत.  ज्याचा आपल्याला व्यावहारिक आयुष्यात काहीच उपयोग होत नाही. मोबाईलच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे रट्टे मारण्याला आता काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला जागृत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण उपयोगी ठरेल. प्रत्येक विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्था आनंदाचे, नवनिर्मितीचे कॅम्पस झाले पाहिजे. नवीन शैक्षिणक धोरण हे क्रांतिकारक पाऊल आहे, असे मत आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.

आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशनसह विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे  आयोजित करण्यात आला होता.  त्यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. करणार नाही आणि करु देणारही नाही. अशी शपथ घेत पुण्यातील १ लाख २३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

नॅकचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, राजेश पांडे, माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, आर्ट आॅफ लिव्हिंगचे राजेश शास्तारे, एज्युयूथ मीटचे प्रमुख हिमांशू नगरकर, शेखर मुंदडा यांच्यासह संस्थाचालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. नव्या शैक्षणिक धोरण व तणावमुक्त शिक्षणासंदर्भात श्री श्री रविशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यावेळी झाला.

आर्ट आॅफ लिव्हिंग फाऊंडेशन, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिंबायोसिस, भारती विद्यापीठ, एमआयटी, डॉ.डी.वाय.पाटील संस्था, सूर्यदत्ता, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे  स्त्री शिक्षण  संस्था, एसपी, सीओईपी अशी महाविद्यालये, एनआरडीसीएम आणि एमआरडीसी यांसारख्या संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

मानवी मूल्ये आणि व्यसनमुक्त भारत या गोष्टींवर सदर कार्यक्रमात भर देण्यात आला.

तरुणांचा देश अशी जगभरात भारताची ओळख असली तरी अचूक मार्गदर्शन आवश्यक आहे. अंमली पदार्थांचा विळखाही तरुणांमध्ये घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे भविष्य अंमली पदार्थमुक्त करणे, अत्यंत गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील मोहिम पूजनीय गुरुदेव सुरु करीत आहेत. करणार नाही आणि करु देणारही नाही, असे या मोहिमेचे नाव आहे. त्याविषयी कार्यक्रमात सांगण्यात आले.

श्री श्री रविशंकर म्हणाले, भारताला नशामुक्त तरुणाईच करू शकते. यासाठी तरुणांनी नवीन उत्साह आणि उमंग सोबत घेऊन चालायचे आहे. प्रत्येक गोष्टीतील आव्हानांचा सामना करतो तो युवा असतो. युवकांनी मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. यासाठी ध्यान आणि योग करा जीवन गमावून आत्महत्या करू नका, असेही त्यांनी सांगितले.

विनय  सहस्रबुद्धे म्हणाले, श्री श्री रविशंकर यांनी मानवतेचे दर्शन सुदर्शन होण्यासाठी आयुष्यभर काम करत आहेत. संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीची ध्वज पताका उंचावण्यामध्ये ते प्रमुख आहेत. नशामुक्त युवा साकारण्यासाठी भारतीय तरुण जगातील युवकांना प्रेरणा ठरतील.

डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, आजच्या तरुणाकडे पाहून लक्षात येते की हा नवीन भारत आहे. संस्कृती आणि विज्ञान या दोन्हीकडे हा युवा पाहतो. विज्ञान आणि अध्यात्म ही कडी आहे आणि या वरच समाजाचा गाडा चालतो. विज्ञान आणि ज्ञानाच्या पुढे प्रग्यान आहे, जे प्रयोगशाळेत देखील अजून समजले नाही आणि हेच प्रग्यान भारताची ताकद आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इतर शैक्षणिक संस्थांसोबत ५ सामंजस्य करार करण्यात आले. तसेच पद्मश्री मुरलिकांत पेटकर यांचा, माजी सैनिक यशवंत महाडीक, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.