नाईक-निंबाळकर, गोरे,खोत यांनी घेतली थेट मोदींची भेट, ‘या’ मुद्यांवर झाली चर्चा 

नवी दिल्ली – माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार सदाभाऊ खोत, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी देशाचे पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करणे, बजेट फार्मिंग योजना कार्यान्वित करणे, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची व्यवस्था करणे, शेतमाल अधिक वेगाने बाजारपेठेत पोचवण्यासाठी रेल्वेचे जाळे आखणे, शेतीमध्ये आधुनिकीकरण करण्यासाठी कृषी महाविद्यालय स्थापण करणे, स्टार्टअप योजनेअंतर्गत नाबार्डच्या (Nabard) माध्यमातून कर्जपुरवठा करणे, असे विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन देशातील शेतकरी कष्टकरी वर्गाला आशादायी असणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

त्याचप्रमाणे साखर कारखान्यांवर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने आकारलेला प्राप्तिकर रद्द करण्याबाबतचा महत्वपुर्ण निर्णय घेतल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तसेच साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला, त्याबद्दल देखील देशाचे पंतप्रधान मोदी यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे यांनी आभार मानले.

दरम्यान, केंद्रतील सरकार हे निश्चितपणाने शेतकऱ्यांना प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशिल राहिल तसेच शेती हा एक उद्योग म्हणून भरभराटीला कसा येईल या दृष्टीने हे सरकार काम करेल, असे मोदींनी या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.