नरेंद्र मोदी तुम्हाला आरक्षण संपवायचे आहे का?; प्रकाश आंबेडकरांचा थेट मोदींवर हल्लाबोल

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ट्विटरच्या माध्यमातून थेट प्रश्न विचारत ‘तुम्हाला आरक्षण संपवायचे आहे का?’ असा थेट हल्लाबोल केला. या सोबतच त्यांनी १० प्रश्नांची सरबत्ती करत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की, मिस्टर मोदी, स्वातंत्र्य दिनाच्या तुमच्या गोलमाल आणि अर्ध सत्यांनी भरलेल्या भाषणाला मीडियाने डोक्यावर घेतलं असले तरी पण मला बरेच प्रश्न पडले आहेत आणि यांची उत्तरं तुम्ही देशाला दिलीच पाहिजेत, असं म्हणत थेट आव्हान दिले आहे. त्यांनी खालील प्रश्न ट्विटरवर मांडत उपस्थित केलेत.

एका श्वासात तुम्ही महात्मा गांधी, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु या स्वातंत्र्य सैनिकांचे नाव घेतले. पण, या लोकांचे विचार धार्मिक कट्टरता आणि असहिष्णुतेपासून स्वातंत्र्याचे होते की हिंदू राष्ट्राचे? नैसर्गिक आपत्तींनी पीडित कुटुंबांसाठी तुम्ही दुःख व्यक्त केला. परंतु जातीय भेदभाव, अत्याचार, झुंडीने केलेले खून, जातीय नरसंहार, धार्मिक कट्टरता आणि लैंगिक हिंसा ई. भाजप निर्मित आपत्तींनी पीडित कुटुंबांसाठी कोण दुःख व्यक्त करेल?

तुमच्या भाषणात नुह येथील हिंसाचाराचा कुठेच उल्लेख नाही. एवढ्या लवकर विसरलात की तुमचे गुंड यात सामील असल्याने तुम्ही गप्प आहात? ज्या लाल किल्ल्यावरून तुम्ही दहा वर्षांपासून १५ ऑगस्टचे भाषण ठोकतायं, ते कोणी बांधले?  #G20Summit बद्दल तुम्ही बरंच बोललात. या #G20Summit ची अध्यक्षता तुमच्या नेतृत्वामुळे मिळाली की, ती या राष्ट्राकडून त्या राष्ट्राकडे फिरत असते आणि तुमचा याच्याशी काडीमात्र संबंध नाही?

२०१४ ला तुम्ही आशा आणि अंगणवाडी सेविकांना जी आश्वासनं दिली ती पूर्ण केलीत का? ज्या प्रादेशिक आकांक्षांना भाजप वैचारिकदृष्ट्या संशयाच्या नजरेने पाहते, त्यांना तुम्ही उत्तेजन कसे देऊ शकता?ज्या लांगूल चालनाबद्दल तुम्ही बोलता त्याची व्याख्या काय आहे? दलित आणि आदिवासींच्या आरक्षण व इतर सामाजिक, राजकीय सुरक्षिततेसाठी असणाऱ्या नितींवर तुमचा डोळा आहे? या नितींना आणखी कमजोर करण्याचे किंवा बंद करण्याचे तुमचे मनसुबे आहेत? की तुम्ही हिंदुत्ववाद्यांच्या लांगूल चालनाबद्दल बोललात जे तुमचं सरकार करतंय?

भाजप RSS ला देशाच्या जनसंख्येची रचना, लोकशाही, आणि विभिन्नता बदलायची आहे का? जर असं नसेल तर हेडगेवार यांनी RSS कशासाठी बनवली? गोळवलकरांनी भारताच्या लोकशाही, धर्मनिरपेक्ष संविधानाला का नाकारले? सावरकरांना गांधीजींच्या हत्येचा आरोपी का केले गेले?तुम्हाला पुन्हा निवडून आणण्यासाठी भाजपा RSS ने किती हत्या, द्वेषाची भाषणे, सोशल मीडियावर अफवा आणि दंगे प्लॅन केले आहेत? मिस्टर मोदी, या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS वर हल्लाबोल केलाय.