‘भारत माता की जय म्हणणार नाही असं बोलणार्‍यांना आज शिवसेना त्यांच्या जवळची वाटू लागलीय’

मुंबई –  राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रस्तावावर विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आघाडीसाठी अनुकुलता दर्शविली आहे.

दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले, शिवसेनेचा नवा मित्र AIMIM पक्ष. ज्या पक्षाला हिंदूच्या नावाची सुद्धा चीड आहे. काही तासांसाठी पोलिस काढा तर हिंदूंना कळेल आमची ताकत असं जाहीर भाषणात बोलणारे, गाय आम्ही खाणारच बोलणारे, भारत माता की जय म्हणणार नाही बोलणार्‍यांना आज शिवसेना त्यांच्या जवळ वाटू लागली आहे. असा टोला राणे यांनी लगावला आहे.