शिवसेनेचे बडे नेते आंदोलनात नसल्याने ‘हम सब एक है’ सांगताना आघाडीच्या नेत्यांना पाळता भुई थोडी !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष मिळून धरणे आंदोलन करण्यात येत असून, सत्तेतील तीन पक्षांची एकजूट दाखवण्यात येत आहे.

असं असलं तरी महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र यावेळी दिसत आहे. रात्री वर्षावर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांचे दीर्घकाळ खलबत झाल्यानंतर आंदोलन करण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र आज प्रत्येक्षात आंदोलन ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची हजेरी दिसत आहे. शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री आंदोलन स्थळी फिरकले नसल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचे स्प्ष्टपणे दिसत आहे.

यावर आम्ही सगळे एकत्र आहोत, तिन्ही पक्ष सोबत आहेत हे महाराष्ट्राला पटवून देताना महाविकास आघाडीची चांगलीच दमछाक झाल्याची पाहायला मिळाली. यावर बोलताना काँग्रेसकडून मंत्री बाळासाहेब थोरात आणि अस्लम शेख म्हणाले, हे महाविकास आघाडीचे एकजुटीचे आंदोलन आहे. त्यामुळे एक-एक करुन शिवसेनेचे देखील बडे नेते यात सहभागी होतील. घाई करु नका, काल सगळे नेते एकत्रित होते. आज देखील ते एकत्रित येतील आणि निषेध आंदोलनात सहभागी होतील. मात्र संध्याकाळ पर्यंत शिवसेनेचा कोणीही मोठा चेहरा आंदोलनस्थळी फिरकला नाही.

तर ऊत प्रदेशात असलेले आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेकडून मंत्री सुभाष देसाई तिथे आहेत, जोडीला आमचे शिवसैनिक आहेत. अर्धे मंत्री आमचे उत्तर प्रदेशमध्ये प्रचारात आहेत. काल रात्री हे आंदोलन ठरल्यामुळे आमचे मंत्री तिथे पोहचू शकले नाहीत. पण बाकी आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्यासह उत्तर-प्रदेशमध्ये प्रचार दौऱ्यावर गेलेले आहेत. तर इतर कोकणातील प्रमुख चेहरे हे भराडी देवी यात्रेला गेले आहेत, त्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दरम्यान, नवाब मलिक यांची केस १९९३च्या बॉम्बस्फोटशी निगडित असल्याने आणि १९९३ची ही केस शिवसेनेशी भावनिक जोडली असल्याने सेनेने या आंदोलनापासून दोन हात लांबच राहण्याचे ठरवल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.