युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घेण्याविषयी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला प्राधान्याने केंद्राशी बोलावे असे निर्देश दिले आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली असून मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, रशिया आणि यूक्रेनच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांच्याकडून उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर भारताची भूमिका काय असावी, यावर बैठक घेण्यात येणार आहे. भारताचे 18 हजार नागरिक यूक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना परत कसं आणायचं. याबाबत नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्र्यांसंह अजित डोभाल यांच्यात चर्चा होणार आहे. रशिया कायम भारताचा मित्र राहिलेला आहे. त्यामुळं भारताची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.