शिवरायांचा खरा इतिहास सबंध राज्यात पोहचवण्याचे काम संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनानीं केले – युवक कॉंग्रेस

ठाणे – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत  राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर काल झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. राज्यात सुरु असलेलं गलिच्छ राजकारण,  मराठा आरक्षण ( Maratha reservation ),ओबीसी आरक्षण ( OBC reservation ), विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, राष्ट्रवादीचा जातीयवाद, समान नागरी कायदा, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या प्रत्यके नेत्याचा शेलक्या शब्दात ठाकरी शैलीत समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री छगन भुजबळ, खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. आपल्या भाषणातून ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा अक्षरशः बुरखा फाडला.

दरम्यान, या धडाकेबाज भाषणात राज ठाकरे यांनी स्व. शिवशाहीर बाबास्हेब पुरंदरे यांचा केलेला गौरव युवक कॉंग्रेसला देखील झोंबला आहे.  दरम्यान, या भाषणानंतर आता मनसेवर महाविकास आघाडीकडून हल्ले चढवले जात आहेत. युवक कॉंग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील यांनी यावरून राज ठाकरेंवर टीका केली आहे. बाबासाहेब पुरंदरेनी या महाराष्ट्राच्या घराघरात खोटा छत्रपती शिवाजी महाराज पोहचवण्याचे काम केलं,त्यांचा पुळका ज्याला कोणाला असेल त्यांनी तो इतिहास घरी पारायण करावा.परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सबंध राज्यात पोहचवण्याचे काम संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनानीं केले हे अख्या महाराष्ट्राला माहीत आहे.

शिव,फुले,शाहू,आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख आहे.त्यात शिवाजी महाराजांना वेगळं आणि फुले, शाहू, आंबेडकरांना वेगळं करून महापुरुषांमध्ये आणि जातींमध्ये फूट पाडण्याचे काम राजसाहेब ठाकरे करताय हे पुरोगामी महाराष्ट्र कधी होऊ देणार नाही. असं बालाजी गाडे पाटील यांनी म्हटले आहे.