आदित्य ठाकरेंची मला कीव वाटते, अयोध्या दौऱ्यावरून राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

अहमदनगर – मनसेचे प्रमुख राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर (MNS chief Raj Thackeray on a tour of Ayodhya) जाणार असल्याने राजकारण ढवळून निघाले असताना आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) सुद्धा अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यावर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (BJP leader Radhakrishna Vikhe Patil) यांनी टीका केली आहे.

मला आदित्य ठाकरेंची कीव वाटते. ते राजकारणात नवीन, त्यांना अजून बरंच काही शिकायचंय. त्यांनी चांगल्या लोकांकडून धडे घेतले पाहिजे,केवळ राज ठाकरे अयोध्येला जाणार म्हणून मी जाणार याने तुमचे हिंदुत्व सिद्ध होत नाही. सत्ता टिकवण्यासाठी तुम्ही ज्या तडजोडी केल्या. त्याबद्दल राज्यातील जनता शिवसेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली.

हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरेंबद्दल देशभरात आदर आहे. मात्र त्यांनी सत्तेसाठी कधी विचारांची तडजोड केली नाही. मात्र आज शिवसेनेने तडजोड केली. त्यांचा प्रवक्ता जे बोलतोय ते बाळासाहेबांचे विचार संपवण्यासाठीच बोलतोय, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय राऊतांवरसुद्धा त्यांनी निशाणा साधला.