‘राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत’

मुंबई : काल झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना फडणवीसांनी पत्रकारांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला. आमचं सरकार सत्तेत येऊन तीनच महिने झालेत. तरीही महाराष्ट्रातून उद्योग राज्याबाहेर चाललेत, असा फेक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. हा फेक नेरेटिव्ह तयार करण्यामध्ये काही राजकीय पक्ष आणि काही HMV पत्रकार एकत्रितपणे महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकारांविषयीच्या त्या विधानावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आक्षेप घेतला आहे. ट्विट करत त्यांनी आपलं मत मांडलं आहे. महाराष्ट्राची बाजू मांडणारा मग तो पत्रकार असो.. युवा असो… किंवा सामान्य नागरिक असो.. हे सर्वचजण नक्कीच #HMV म्हणजे #He_is_Maharashtra’s_Voice आहेत. राजकीय नेते गप्प बसले तरी खरे #HMV मात्र महाराष्ट्राची भूमिका मांडताना कधीही गप्प बसणार नाहीत, असं रोहित पवार म्हणालेत.

कितीही प्रयत्न केले तरी सामान्यांचा आवाज दाबता येत नाही. आजची राजकीय परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्या प्रत्येकालाच आवाज उठवावा लागणार आहे आणि #WMV म्हणजेच #We_Are_Maharashtra’s_Voice व्हावं लागणार आहे, असंही रोहित पवार म्हणालेत.