कपटी भावापेक्षा दिलदार शत्रू बरा, उद्धव ठाकरेंच्या त्या पत्रानंतर मनसेचा हल्लाबोल

मुंबई – महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची (Andheri East Bypoll Election) चर्चा आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून (BJP) या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेल (Murji Patel) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आता शिंदे गटाच्या आमदाराने देखील CM एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं. शरद पवारांच्या या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला. शिवसेना कुटुंबाकडून आभार, असं म्हणत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे, पण उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर मनसेने त्यांच्यावर पलटवार केला आहे.

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी साद घातली, त्यावर लगेच उद्धव ठाकरे यांनी आभार मानणारे पत्र लिहिलं. या पत्रात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंनी फडणवीसांना विनंती केलेल्या पत्राबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही, त्यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. ‘राजसाहेब एक म्हण आठवली कपटी भावापेक्षा दिलदार शत्रु बरा’, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.