मोदींचा मुंबई गिळण्याचा डाव आहे; संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघात

Sanjay Raut: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केलाय. केंद्र सरकारचा मुंबईवर डोळा आहे. केंद्राला मुंबई गिळंकृत करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मुंबईची सूत्रे हाती घेतली आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेने हे होऊ दिलं नसतं, त्यामुळेच शिवसेना फोडण्यात आली. एक बुळचट आणि सत्तेसाठी लाचार मुख्यमंत्री खुर्चीवर बसवला गेला, अशी घणाघाती टीका शिउबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केंद्र सरकारवर केली.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये आणि राजधानी असली तरी मुंबईवर महाराष्ट्राचं नियंत्रण राहू नये यासाठी अनेक वर्ष किमान दहा वर्ष हे मोदी यांच्या सरकार प्रयत्न करत आहे. त्यांनी सुरुवातीला मुंबई कमजोर केली. मुंबईतील व्यवसायांची आंतरराष्ट्रीय कार्यालय हे गुजरातमध्ये खेचून नेली. मुंबईच्या आर्थिक नाड्या आवळल्या. शेवटी मुंबईचा विकास आता महाराष्ट्र सरकार करणार नाही.त्यासाठी निवडणुका होऊ दिल्या जात नाही. मुंबईची सर्व सूत्र हे ठरल्याप्रमाणे मोदींच्या या सरकारने उद्योगपती धनिकांच्या सरकारने दिल्लीकडे घेतली आणि आता त्यांचा खरा चेहरा उघड झाला, असं संजय राऊत म्हणालेत.

आज अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. मुंबई गिळण्याचा हा अत्यंत भयंकर असा डाव आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांचा सरकार पाडलं गेलं. त्याचसाठी शिवसेना पक्ष फोडला गेला. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडली. आताच्या केंद्र सरकारला मुंबईवर ताबा हवा आहे. मुंबई गिळायची आहे. मुंबई विकायची आहे. मुंबई लुटायची आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.