शाहू महाराज यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांचा मुखवटा फाडला – संजय राऊत 

कोल्हापूर –  संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीवरून राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच त्यांचे वडील शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केलेल्या दाव्यामुळे आता संभाजीराजे आणि शाहू महाराज यांच्यातच मतभेद असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संभाजीराजेंची व्यक्तिगत उमेदवारी नाकारली गेल्यामुळे घराण्याचा अपमान वगैरे झाल्याचा प्रश्नच येत नाही, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज यांनी दिली आहे.

शाहू महाराज म्हणाले, छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा यामध्ये प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. शिवसेनेने उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली आहे. आमच्यामध्ये काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसं काही झालं नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले, पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते. 2009 सालापासून संभाजीराजे यांनी वाट वेगळी पकडली. भाजपनं (BJP) दिलेल्या खासदारकीला माझा विरोध होता, पण शेवटी लोकशाही आहे. त्यावेळी देखील त्यांनी चर्चा केली नव्हती. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं होतं.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले,  कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे आभार मानतो . त्यांनी संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा संभ्रम दूर केल्याचे राऊतांनी सांगितले. शाहू महाराज यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांचा मुखवटा फाडला, असे राऊत म्हणाले. कोल्हापुरात आजही सत्य आणि प्रामाणिकपणा आहे हे छत्रपती शाहू महाराजांनी आज पुन्हा दाखवून दिलं. शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा कधीही अपमान केला नाही, शिवसेनेनं छत्रपती घराण्याचा मान राखला. छत्रपती शाहू महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे अंबाबाईचा प्रसाद आहे. भाजपवाल्यांनो आता तरी शांत व्हा आणि गप्प बसा. अशी टीका राऊतांनी केली.