MIMला आघाडीत घ्यायचं की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील – राजेश टोपे

जालना – गेल्या अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. तीन पक्षांच्या सरकारवर सातत्याने भाजपाकडून टीका केली जात असताना सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी सत्तासमीकरणं जुळण्याची चर्चा सुरू झाली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधून एक मोठी बातमी हाती आली आहे.

औरंगाबादमध्ये एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एवढंच काय तर शिवसेनेसोबतची जाण्यास आम्ही तयार आहोत, असं वक्तव्य त्यांनी केलंय. एमआयएममुळे प्रत्येक निवडणुकीत मतांचे विभाजन होते आणि भाजपाचा विजय होतो, असा आरोप अनेकदा केला जातो. हा आरोप भविष्यात एमआयएमवर केला जाऊ नये, यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर एमआयएमला आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी केलं आहे. टोपे यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला. मुस्लिम बहुल समाजाचे प्रश्न सोडवणाऱ्या पक्षांसोबत आम्ही यायला तयार आहोत, असं जलील यांनी सांगितलं. त्यांनी फक्त प्रस्ताव ठेवला. मी फक्त ऐकून घेतलं. दॅट्स ऑल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.